Tuesday, June 6, 2023

फिजेट स्पिनर भाग ७ (मेघा कुळकर्णी)

मुंबईत हिंडतांना दुपारचे जेवण जुहूला इस्कॉनच्या मंदिरातच घ्यावे हेही त्यांनीच सुचवले. अप्रतिम जेवण तिथे मिळेल असे त्यांनी सांगितल्याने दुपारी सगळे जुहूला गेले.

मंदिराचा भव्य परिसर,तिथले शांत वातावरण याने मंडळी भारावली होती. एलानालाही तिथली शांती अंतर्मुख करून गेली. मुलाच्या मृत्युनंतर इतके शांत तिला कधीच वाटले नव्हते. श्रीकृष्णाची मूर्ती बघतांना तर ती हरवून गेली त्या रुपात. तिचा लेक, रॉजरच, तिच्याकडे बघून हसतोयसं वाटत होतं तिला. प्रसादाचं जेवण घेऊन तृप्तावलेल्या मनाने तिथली भजनं ऐकत संध्याकाळ पर्यंत त्या वातावरणातच सगळे थांबून राहिले. बाकीचं मुंबई दर्शन दुसर्या दिवशी करण्याचं एकमुखाने ठरवलं त्यांनी.

घरी आल्यावर एलानाने श्रीकृष्णाबद्दल जाणून घेण्याची इच्छा दाखवली. अजितसरही रात्री तिथेच थांबणार होते. त्यांनी रात्रीची जेवणं झाल्यावर श्रीकृष्णाच्या जन्मापासूनची कथा रसाळ भाषेत सांगितली. जन्माआधीपासून त्याच्यावर येणारी संकटं, त्यातून पार पडलेला तो, जन्मताच आई बापांपासून झालेली ताटातूट, गोकुळात त्याचं होणारं कौतुक, यशोदा-नंदाचं मिळालेलं प्रेम, गोप गोपिकांचा सखा...परदेशी पाहुण्यांबरोबरच देशी मंडळीही ती अवीट कथा पुन्हा अनुभवत होते.

नंतरचे काही दिवस रोज नवीन काही तरी पाहुण्यांना दाखवण्यात गेले. कार्ला केव्ह्ज झाल्या. मढ आयलंडचा गोल्डन पैगोडा बघून झाला. एकदा त्या दोघांना कंपनीच्या ऑफिसमध्ये नेऊन अजितसरांनी त्यांच्याशी नवं कॉन्ट्रेक्ट करून घेतलं. यात त्यांना पूर्वीपेक्षा जास्त फायदा होता. मुजुमदार सरांनी केलेले अन्याय अजितसर एक एक करून सुधारत होते.

काही दिवस सगळी मंडळी संतोषच्या गावाला जाऊन आली. त्यांच्यासाठी जमतील तितक्या सोयी करण्याचा प्रयत्न संतोषच्या घरच्यांनी केला होता. परदेशी पाहुण्यांनीही खेड्याच्या वातावरणात सामावून जाण्याचा पूर्ण प्रयत्न केला. एकमेकांना कसलाही त्रास होऊ नये याची सगळेच काळजी घेत होते.

आजी पार खंगली होती. पण चीवटपणाने अजून तग धरून होती. आजीची आणि घराची देखभाल करण्यासाठी काका घरीच थांबला होता. त्याची आणि आजीचीही संतोषशी भेट झाली तो प्रसंग हृदयद्रावक होता. आजीने थरथरता हात वर करून संतोषच्या चेहऱ्यावरून फिरवला. तिच्या डोळ्यातून पाणी घळघळा वाहत होते. त्याची आपली भेट होईल ही आशा तिने कधीच सोडली होती.

शेतावर गेल्यावर जुनं ग्रीन हाउस बघून संतोषला जुने दिवस आठवले. या सगळ्या सामुग्रीचा परत नीट उपयोग करायचा त्याने निश्चय केला. सरांचा आणि ब्रैडचा सल्ला घेऊन परत त्या जमिनीवर फुलांचे ताटवे उभे करण्याचं त्याने ठरवलं. बाजारपेठेची आता त्याला चांगली माहिती झाली होती.

यंदा शेतात गहू, बाजरी आणि तूर लावली होती. गेल्या वर्षी मका आणि मुग लावले होते पण त्या पिकांनी फारसा हात दिला नव्हता. काकाला तुरीसंबंधी काही जुजबी टिप्स सरांनी दिल्या. पोटापुरतं शेतात उगवत होतं. कर्जफेड करायला संतोष पाठवत असलेले पैसे कामी येत होते. बहिणींची शिक्षणं तालुक्याच्या महाविद्यालयात होत होती. त्या दोघींनीही दादासारखंच शेतकी विषयाचा डिप्लोमा करण्याचं ठरवलं होतं.

क्रमशः

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...