Tuesday, June 6, 2023

फिजेट स्पिनर भाग ८ (मेघा कुळकर्णी)

होता होता महिना कसा संपत आला कोणालाही कळले नाही. शेवटचे काही दिवस मथुरा, वृन्दावन, आग्रा, फत्तेपूर सिक्री वगैरे करून दिल्लीहून विमानाचं तिकीट काढून लंडनहून नेदरलँड्सला जाण्याचे पाहुण्यांनी ठरवले.

अजूनही एलानाला संतोष त्यांच्या बरोबर येणार नसल्याचे माहीत नव्हते.
परत सगळी मंडळी दौर्यावर निघाली. मथुरा, वृन्दावनात कृष्ण जिथे जिथे गेला, खेळला तिथे प्रत्येक ठिकाणी एलाना जाऊन आली. दर ठिकाणी थांबून जणू काही ती कान्ह्याचं बाळपण, त्याच्या क्रिडा स्वतः अनुभवत होती. गाडीतून सगळ्यांनी गोवर्धनाची परीक्रमाही केली. सरांकडून गोवर्धनाची हकीकत ऐकतांना, निरुपयोगी रूढी परंपरा तोडणारा कान्हा एलानाला जाणवला. रॉजर असाच ठाम असायचा आपल्या मतावर.

नेमके ते दिवस होळीच्या सणाच्या आधीचे होते. बरसाना-राधेचं गाव, आणि नंदगाव-कृष्णाचं गाव, या दोन ठिकाणी लट्ठमार होळीची तयारी चालू होती. या सगळ्यांना ती गम्मतही बघायला मिळाली. कान्हा त्याच्या मित्राबरोबर बरसानाला आला होता आणि राधेला त्याने मस्करीत चिडवले म्हणून गोपी त्यांच्यामागे लाठ्या घेऊन नंद्गावापर्यंत आल्या, अशी आख्यायिका आहे. तिची आठवण म्हणून या दिवसात नन्दगावचे तरुण बरसानात येतात आणि ब्रज भाषेतील होळी गीते गातात. बरसानाच्या स्त्रियांना चिडवतात. मग बरसानाच्या स्त्रिया त्यांच्या मागे लाठ्या घेऊन धावतात आणि त्यांना मारतात. ते आपला बचाव ढाली घेऊन करतात. सगळा खेळच असतो तो. एकमेकांवर रंग उडवायचा. ब्रज भाषेत एकमेकांना चिडवणारी गाणी म्हणायची. भांग आणि लड्डूचा आस्वाद घ्यायचा. सगळ्यांनीच मनमुराद मजा करून घेतली त्या खेळात सहभागी होऊन. एलानाला कृष्णाचं आणखी एक खट्याळ रूप बघायला मिळालं. रॉजरचा हसरा चेहरा मध्येच डोळ्यासमोर तरळून गेला.

आग्र्याचा ताजमहाल, दिल्लीचा लालकिल्ला यांच्या भव्य दर्शनाने जितके सगळे भारावले तितकेच फत्तेपूर सिक्रीच्या सलीम चीस्तीच्या दर्ग्यावरच्या नक्षीकामानेही थक्क झाले. आग्र्याच्या राधास्वामी मंदिरावरचे संगमरवरी कोरीवकाम बघून हरखले. कुरुक्षेत्रावर सरांनी कौरव पांडवांच्या युद्धाचा प्रसंग, डोळ्यासमोर घडत असल्यासारखा, आपल्या शब्द सामर्थ्याने उभा केला. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः.. श्रीकृष्णाच्या गीतेचे शब्द कानावर पडत असतांना एलाना विचारात गढून गेली होती.

क्रमशः

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...