Saturday, January 24, 2015

अंधश्रद्धाळू...!! कोण...!?

आमच्याकडे धुणं-भांडी करणार्या आज्जींची परवा एका पोस्टमुळे आठवण झाली. आज सांगु... उद्या सांगु करत आठवण शेयर करायची राहुनच गेली होती. आज ’पीके’ बघितल्यावर मात्र लगेचच लिहून काढावी असं वाटलं...!!

वयाची जवळ-जवळ पासष्ठी ओलांडलेल्या... तोंडाचं बोळकं असलेल्या... डोक्यावरचे विरळ होत जाणारे पण पिकून संपुर्ण पांढरे झालेल्या केसाचा सुपारीयेवढा आंबाडा बांधणार्या... डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा अन त्यात एका डोळ्याला मोतीबिंदू... स्वत: शाळेचं तोंडदेखिल न पाहिलेल्या तर नातवाचं शिक्षण अगदी चांगलं चौदावी-पंधरावीपर्यंत झालयं असं अभिमानानं सांगणार्या आमच्या आज्जी...! त्यावेळेला प्रत्येक कामाचे पन्नास रुपये ह्या हिशेबाने संपुर्ण महिन्याचे जेम-तेम दीडशे रुपये त्या आमच्याकडून घ्यायच्या. अशी फार तर आठ-दहा घरं करण्यात त्यांचा दिवस आणि कंबर मोडत असे. त्यांचं काम काही फार स्वच्छ नव्हतं. अंधुक नजरेतुन बर्याच वेळा भांड्यांना खरकटं तसंच राही. माझी आई पुन्हा एकदा भांडी विसळून घेई. पण तरी आज्जींना अजुन ’पिंक स्लीप’ मिळाली नव्हती कारण एखाद-दुसरे वेळी तब्बेतीचं कारण सोडलं तर त्यांचं आजिबात खाडं नसे.

पण ह्या आज्जींची एक गंमत होती. पंढरपुरच्या वारीचे दिवस आले की त्यांना विठुरायाच्या भेटीची ओढ लागे. महिना-दीड महिना त्या गायब होत असत. हा जून-जुलैचा महिना नेमका पावसाचा आणि मुलांच्या शाळा सुरु होण्याचा. त्यात आज्जींची long service leave म्हणलं की त्यांच्या सगळ्या मालकीणींची चिड-चिड होई. त्या सुट्टीवर जाऊ नयेत म्हणुन बायका त्यांना धमकी देत असत...”बघा हां आज्जी.. तुम्ही येवढ्या मोठ्या सुट्टीवर गेलात तर आम्ही दुसरी बाई ठेऊ... तुमचं काम जाईल बघा मग... परत आलात तर ऐकुन घेणार नाही...!!" त्यावर आज्जी अगदी मिश्किल चेहरा करुन म्ह्णत... ’जाऊ द्या बाई... विठोबा देईल ते घ्यायाचं... ठेवलं तुमी कामावर तर ठेवलं... न्हाई तर न्हाई...!!’ पण त्यांना पंढरपुरच्या वारीला जाण्यापासुन थांबवणं कुणालाच शक्य होत नसे. वारीला आज्जी जाणार म्हणजे जाणारच. माझ्या आईनी त्यांना कधीच आडवलं नाही. उलट ती त्यांना वारीला जाताना शिधा बांधुन देत असे.

अश्याच एका वारीनंतर काही अंधश्रद्धा निर्मुलन करणार्या संस्थेनी किती लाख लोकांचे किती कोटी man hours एका गावाकडून दुसर्या गावाकडे चालत जाण्यात वाया जातात वगैरे जावई शोध लावला. त्यात ह्या सगळ्या वारकर्यांच्या अंध(?)श्रद्धेचा पायाच मोडून काढावा अश्या उद्देश्याने थेट माऊलींच्या समाधीगुहेतच कॆमेरा सोडून आत काय आहे हे पाहण्याचा घाटही घातला होता.
ह्या सगळ्या गोष्टींवर आज्जींचं मत काय आहे हे मला जाणून घ्यावं वाटलं. मी म्हणलं, "आज्जी... माऊलींच्या समाधीगुहेत केमेरा सोडून पाहायचं म्हणतायत... तुम्हाला काय वाटतं...!? असतील का अजुन ध्यान लावून बसलेले महाराज तिथे...!? काय असेल खाली...!?" त्यावर केरसुणीनी केर पुढे ढकलत आज्जी म्हणाला... ’खुळ्याचा बाजार हाय... त्यात काय असायचंय तवा... हाडकं दिकुन सापडायची न्हाईत आता इतक्या वर्सांनन्तर...!!’

मी हे ऐकुन अक्षरशा: चाट पडलो. दरवर्षी वारीमध्ये कित्येक man hours वाया घावलणार्या... हातावरचं पोट असूनही महिना बाराशे-पंधराशेचा straight loss सहन करणार्या... परत आल्यावर रोजगार मिळेल की नाही ह्याची कणभरही फिकीर न करणार्या... नखशिखांत आडाणी... पंढरपुर, अक्कलकोट आणि गाणगापुर सोडलं तर आयुष्यात कधी फार न फिरलेल्या... वयाच्या पासष्ठ वर्षांत साधा समुद्रही कधी न पाहिलेल्या आज्जी... त्यांना पुर्ण कल्पना होती की समाधीमध्ये काय असेल ह्याची. तरी त्यांच्या माऊलींवरच्या श्रद्धेतला एक कणही कुठे इकडे-तिकडे झालेला दिसत नव्हता.
भलत्या-सलत्या बाबांच्या नादाला लागणारे, नको त्या महाराजांच्या पाया पडणारे आणि भोळ्या लोकांना देवाच्या नावाने लुबाडणारे जेवढे वर्ज्य़... तेवढेच देवळात जाणार्या सरकसट सगळ्यांना अंधश्रद्ध समजणारे, जप-ध्यान करणार्यांना मुर्ख समजणारे आणि समस्त हिंदू हे भोंदू आहेत हे समजणारे तर महा-वर्ज्य...!! दोघंही दोन टोकांचे अतिरेकी...!!

पंढरपुरच्या वारीत दिसणारे वेडेबागडे... बेभान होऊन नाचणारे... विठ्ठलाच्या नामगजरात हरवून जाणारे... आडाणी लोक... सगळेच्या सगळे ’अंधश्रद्ध’ आहेत असा आपला समज असेल तर आपल्याइतके आडाणी आणि आंधळे आपणच...!!

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...