महाराष्ट्राचा राजपट... चौसष्ठ नाही.. बत्तीसच चौकड्यात रमणारा..
आठ प्याद्यांची ये जा.. मागे आठ पल्लेदार लढवय्ये उभे.. सगळ्यांची तोंडे एका बाजूला नाही तर समोरासमोर...
आपल्या-आपल्यातच धोबी पछाड देण्यात मग्न... दिसायला चाल कट्टर शत्रूची पण कोण कधी कुणाचा खासा मित्र, कोण कुणाचा साडू तर कुणी सख्खे चुलत भाऊ...!!
काळ सरे तसा खेळ.. एकेक मावळा पडला तसा त्याचा वीर..
अडीच पावलात थेट शत्रूच्या गोटात शह देणारा अश्व पडला आणि खेळातला 'प्रमोद' नाहीसा झाला...
नाकासमोर सरळ चालून धडकेत गनिम गारद करत गजचाल करणारा 'आबा' गेला..
तिरक्या अन सुसाट चालीत बत्तीस चौकड्या ओलांडलेला 'गोपीनाथ' गेला.. अन दिनदुबळा अनुयायी पुन्हा अनाथ झाला...
कहर उडाला जेव्हा 'महाराष्ट्र हृदय सम्राट'च शिवचरणी विलीन झाला.. खरं तर डाव तिथेच संपला होता. महाराष्ट्र चार शतकानंतर पुन्हा एकदा पोरका झाला होता...!!
नवीन पट मांडायला हवा होता... पण... पण...
अजून पटावर वजीर उभा आहे. दिशेचं बंधन नसलेला.. एकाच डावात कितीही चौकड्या ओलांडू शकणारा.. कुणालाही कुठेही गारद करण्याचे सामर्थ्य असलेला..
ह्याच्या समशेरीइतका खणखणाट कुणीच पाहिला नसेल... इतके उन्हाळे रणरणताना... इतकी वादळे कोसळताना... तोरणे लागताना आणि सीमा उल्लंघताना.. पटाचे चारही कोपरे पादाक्रांत केलेला... ह्यासम हाच...!!
पण हाय दुर्दैवा.. द्वादशगुणीमती व्यर्थ.. अनुभव व्यर्थ.. गुरुविद्या व्यर्थ.. मित्रसोबती व्यर्थ...
आपल्याच बत्तीस चौकड्यात रमतोय.. आपल्याच प्याद्यात भिन्न रंग ठरवतोय... त्यांना एकमेकातच भिडवतोय.. त्यांच्याच खांद्यावर बसून सम्राट बनण्याचे स्वप्न बघितोय…!!
दुर्दैव... शौर्यवान आणि सामर्थ्यवान योद्धे पटावर असून शतकानुशतके दुय्यम स्थान मिळालेल्या माझ्या महाराष्ट्राचे अखंड दुर्दैव...!!
अंधेरा कायम रहे..!!
प्रणव

No comments:
Post a Comment